बँकेच्या कर्जामध्ये जामीनदार आहात? आणि कर्जदार कर्जाचे हप्ते भरत नसेल तर, काय आहेत नियम जाणून घ्या सविस्तर - Bank Loan Guarantor Rules in Marathi
तुमच्या ओळखीतील एखाद्याला बँकेकडून कर्ज हवे होते, तुम्ही त्याला जामीन दिला, आणि तुमच्या जामीनाच्या आधारे बँकेने त्याला कर्ज दिले. तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या फायद्यासाठी जामीन दिला आहे. साहजिकच तुमचा त्याच्यावर विश्वास होता, म्हणूनच तुम्ही जामीनदार राहिलात. स्वखुशीने व कोणत्याही जबरदस्ती शिवाय बँकेच्या कागदपत्रांवर सही दिली.
या सर्व गोष्टी जर तुम्ही स्वतःच्या मनाने, विचारपूर्वक केल्या असतील, तर सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे तुम्ही त्याच्या कर्जफेडीची जबाबदारी घेतली आहे. आणि आता ती तुम्हाला पार पाडायची आहे.
कर्ज थकल्यास जामीनदार जबाबदार.
न्यायालयाच्या निर्णयानुसार आता कर्ज परतफेड करण्यास जामीनदार सुद्धा तेवढेच जबाबदार असतात जेव्हढे कि कर्जदार जबाबदार असतात. जर कर्जदार हप्ता भरत नसेल तर, आणि तुम्ही जमीनदार असाल तर, तुम्हाला त्याचे मन वळवावे लागेल, समजावून सांगावे लागेल, त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलावे लागेल. कारण यापासून तुम्हाला वाचवणारी ती जगातील एकमेव व्यक्ती आहे. तरीही त्याने हप्ता भरण्यास नकार दिल्यास, मग मात्र बँकेकडे दुसरा पर्याय उरणार नाही. आणि बँक त्याच्या कर्जाची वसुली तुमच्याकडून करणार.
लक्षात ठेवा, बँका जे पैसे एखाद्याला कर्जाच्या स्वरूपात देतात, ते पैसे खरे तर त्यांचे स्वतःचे नसतात. तो पैसा तुमच्या-आमच्यासारख्या असंख्य ठेवीदारांचा आहे, ज्यांनी त्या बँकेत आपली घामाची कमाई जमा केली आहे, कारण ते पैसे बँकेत सुरक्षित राहतील आणि आणखी वाढतील.
त्यामुळे अशा स्थितीत कर्ज स्वरूपात दिलेले पैसे व्याजासह परत आणण्यासाठी प्रयत्न करणे हे बँकेचे कर्तव्य आहे.
कर्ज फेडावंच लागेल.
म्हणून, वस्तुस्थिती स्वीकारा. कर्ज परतफेड करण्यासाठी बँकेला मदत करा. बँकेच्या दृष्टीने आता तुम्हीदेखील डिफॉल्टर आहात. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आणि पैसे वसूल करण्यासाठी बँक सर्वतोपरी प्रयत्न करेलच.
अशा वेळी तुमची भूमिका सौम्य असली पाहिजे. यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. जर ते तुमच्या समस्येशी सहमत असतील तर ते तुम्हाला अधिक वेळ देतील. आणि कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवला जाईल. पण कर्ज मात्र फेडावेच लागेल.
जामीनदाराच्या बँक खात्यावर काय परिणाम होईल?
कर्जदार कर्जाचे हप्ते भरत नसेल तर, यामुळे अर्थातच तुमच्या बँक खात्यावर गदा येऊ शकते. मात्र तुमचे खाते जर 'पगार खाते' असेल तर नियमानुसार तुम्हाला थोडा फायदा मिळू शकतो. कोणत्याही व्यक्तीच्या पगाराच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी घेता येत नाही. त्यातही, आधी एक हजार रुपये बाजुला ठेवावे लागतात.
उदाहरणार्थ; एखाद्याचा पगार ₹.28,000 असल्यास, फक्त ₹.9,000 हप्त्यापोटी घेतले जाऊ शकतात. (28000 - 1000 ) = 27000÷3)
तसेच, ही कपात केवळ 24 महिन्यांपुरतीच मर्यादित असते. त्याच्यानंतर पैसे कापता येत नाहीत.
त्याच व्यक्तीच्या नावे असलेल्या दुसऱ्या एखाद्या कर्जासाठी जर कपात करण्याची वेळ आली तर पहिल्या कपातीची मुदत संपल्यानंतर एक वर्ष प्रतीक्षा केल्यानंतरच ती मिळू शकते.
तसेच, तुमच्या पेन्शनवर कोणतीही कपात लागू होत नाही.
त्यामुळे, जर तुमचे खाते पगार खाते असेल, तर एका मर्यादेपर्यंतच बँक हप्ते वसूल करू शकते.
मात्र जर तुमचे खाते निवृत्तीवेतन खाते असेल तर, मात्र बँक त्याला हात लावू शकत नाही.
जामीनदार म्हणून राहताना कोणती काळजी घ्याल ?
- ओळख आणि विश्वास नसणाऱ्या व्यक्तीची अजिबात हमी घेऊ नका.
- कर्जदाराने कर्ज घेण्यासाठी त्याची पुरेशी मालमत्ता तारण दिली आहे का ते तपासा. अपूर्ण तारण असलेल्या कर्जाची हमी घेऊ नका.
- कर्जदाराला कर्जाचा विमा घेण्याचा आग्रह करा, त्यामुळे तुमची जोखीम कमी होईल.
- शक्यतो नाही म्हणायला शिका, कोणाच्याही दबावाला बळी पडून कोणाचीही हमी घेऊ नका.